कथारुप यशवंतराव- हे पक्षवाढीचेच काम आहे !

हे पक्षवाढीचेच काम आहे  !           
   
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यावेळी आबासाहेब निंबाळकर अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते एकदा यशवंतरावांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याबरोबर त्यावेळचे काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते बाळासाहेब विखे - पाटील होते.

कार्यकर्त्यांना नावाने आणि एकेरी हाक मारणे हे चव्हाण साहेबांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य होते. बाळासाहेबांना त्यांनी विचारले,' एकनाथ, जिल्ह्यात काय चाललंय ?'

बाळासाहेब म्हणाले, ' जिल्ह्यात विरोधी पक्षांचा मोर्चा आहे. ते मुळा धरणाचं पाणी मागत आहेत. पण साहेब, त्यांना कोणी साथ देणार नाही. लोक त्यांच्याबरोबर नाहीत. तुम्ही मोर्चाची काळजी करू नका.'
यावर यशवंतराव गंभीरपणे म्हणाले, ' मी वाचलंय वर्तमानपत्रात. कॉम्रेड दत्ता देशमुखांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा निघतोय. एकनाथ, दत्ताला निरोप दे. खूप मोठा मोर्चा काढ म्हणावं. मी मोर्चाला सामोरे जाऊन स्वागत करणार आणि पाणी देण्याची घोषणा करणार. ' यशवंतरावांचे हे धोरण कार्यकर्त्यांना समजेना. ते बुचकळ्यात पडले. विरोधी पक्ष मोर्चा काढणार, मुख्यमंत्री त्या मोर्चाला सामोरे जाणार आणि त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करणार. मग पक्ष कसा वाढणार ? कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यशवंतरावांनी कार्यकर्त्यांच्या मनात चाललेला गोंधळ ओळखला. ते म्हणाले, ' हे बघा, घोषणा मी करणार. मी म्हणजे कोण ? तर मुख्यमंत्री. मुख्यमंत्री कोणाचा ? तर तुमचा, म्हणजेच काँग्रेसचा, म्हणजे घोषणा कोण करणार ? तर काँग्रेस . मग भीती कशाला बाळगता ? आपला पक्षच घोषणा करणार आहे हे पक्षवाढीचे काम आहे.' यशवंतरावांनी दिलेले स्पष्टीकरण ऐकून सगळे निरुत्तर झाले.

आजपर्यंत त्यांनी यशवंतरावांच्या मुत्सद्देगिरीविषयी ऐकले होते. आज त्यांना तिचे प्रत्यक्ष दर्शन घडले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org