माझ्या राजकीय
आठवणी
लेखक : हरी पांडुरंग तथा हरिभाऊ लाड
--------------------------------
| Ebook साठी येथे क्लिक करा |
माझ्याहून थोडे वयाने मोठे व खरे म्हणजे माझे बालपणचे मित्र श्री. हरिभाऊ लाड यांनी आपल्या राजकीय आठवणी लिहिल्या आहेत. आम्ही आमच्या लहानपणी एकत्र केलेल्या सार्वजनिक कामाचा वृतांत त्यांनी यात तपशीलाने सांगितला आहे. आमच्या छोट्या गांवी आम्ही केलेल्या छोट्या प्रयत्नांची हकीकत वाचतांना माझे लहानपण पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आले. श्री. हरिभाऊ लाड म्हणजे आमचे, दुबळ्या शरीराचे पण कणखर मनाचे खरे मित्र आहेत. त्यांच्या संबंधीचा माझा लोभ व आदर पहिल्यापासून आहे व अखेरपर्यंन्त राहिल. आम्ही लहानसहान माणसांनी असामान्य कामें करण्याची आकांक्षा धरली आणि शक्तीप्रमाणें थोडे थोडे प्रयत्न केलेत. त्यातूनच गांधीजींनी हा भारत निर्माण केला. आम्हां सर्व लहानांना गांधीजीच्या विचारांनी प्रेरीत केले. त्याची आज कृतज्ञतापूर्वक आठवण मनांत येते.
हरिभाऊंच्या आठवणी त्यांनी सुबोध, सुव्यवस्थित व कालक्रमाने लिहिल्या आहेत. माझ्या बाबतीत कांही घटनांचा तपशील कदाचित पुढे-मागे करावा लागेल. परंतु तो त्यांनी सह्द्यतेने व आपुलकीने लिहिला आहे.
हरिभाऊंच्या या प्रकाशनास माझ्या शुभेच्छा.
- यशवंतराव चव्हाण



















































































































