यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३५-२४१०२०१२-४

स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या आम्हा स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आपुलकीचे विशेष संबंध निर्माण झाले आहेत.  एका परिवारातील माणसे जशी नाजूक प्रेमभावनेने बांधली जातात तसाच काहीसा हा प्रकार आहे.  त्यामुळे एकमेकांचे दोष माहीत असूनही आमच्यामध्ये पारिवारिक सौहार्द आहे.  परस्परांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो.  अडीअडचणीच्या वेळी साहाय्य देण्यास, मागण्यास मनाला संकोच वाटत नाही.  नव्या पिढीतल्या लोकांना आमच्या पारिवारिक संबंधाचे आकलन होऊ शकत नाही.  मेतकूट वाटते आणि त्याचे महत्त्वही समजत नाही.  म. गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्यांना हा अमूल्य वारसा मिळाला आहे.  या मार्गाने जाण्यातच जीवनाचे साफल्य आहे असे आम्ही मानतो.  त्यामुळे आमच्या जीवनात वैफल्याचे सावट येऊ शकत नाही.  

यशवंतरावांनी आपल्या जीवननिष्ठांशी कधी प्रतारणा केली नाही.  मतभेद असून शकतात.  कित्येक वेळा भल्याबुर्‍या संबंधीचे चुकीचेही ते होऊ शकतात.  कालांतराने तसे सिद्ध होऊन जाते.  परंतु जो निर्णय घेतला तो अंतरात्म्याला साक्षी ठेवून घेतलेला असतो.  म्हणूनच माझ्या-त्यांच्यामध्ये सतत सामंजस्य राहिले आहे.  निराळ्या शब्दांत सांगायचे तर आमच्यामधील व्हेवलेंग्थ कधीच मोडलेली नाही.  त्यांनी दिलेला शब्द मोडल्याचे कधीच स्मरत नाही.  त्यांच्याबद्दल माझा हा विश्वास माझ्या काही मित्रांना पसंत पडत नसे.  परंतु त्यांची चूक मागाहून त्यांना कबूल करावी लागे.

अनेकदा जीवनात अटीतटीचे प्रसंग आले.  अत्यंत कौशल्याने आम्ही त्यातून मार्ग काढला.  व्यक्तीगतरीत्या आम्ही कधीही कमरेखाली वार केले नाहीत की कुचाळक्या केल्या नाही.  माणसे भांडणारच; पण ती कशासाठी भांडताहेत ते महत्त्वाचे.  भांडण महत्त्वाचे नाही.  हे आम्हापुरते नीट आकलन झालेले होते.  संयुक्त महाराष्ट्राचा काळ आम्हा दोघांसाठी फार कसोटीचा होता.  पण आमचे अंडरस्टँडिंग फार पक्के होते.  नुसत्या देहबोलीने आम्हांला समजत असे.

अण्णा, आज जसे तुम्ही बोललात तसे पूर्वी बोलला नाहीत कधी ?

अरे, आता जाण्याचे दिवस जवळ आले ना ?  आता कसला रागलोभ.  व्हायचे ते तर होऊन गेले.  आता या सर्वापलिकडे गेलो म्हणून मोकळेपणाने बोललो.  आपल्या लोकांना शाहू, फुले, आंबेडकर हे गणित कळले नाही.  मग बिचारे यशवंतराव कसे कळणार ?  तुम्ही तरुण लोक डोळसपणे पाहाताय ना ?  याचसाठी तर सारा आयुष्यभर प्रपंच केला.  खरे की नाही ?  अण्णा हातावर टाळी देत.  आम्ही हसत गुलाम अलीच्या गजला लावल्या.  अण्णांचा आवडता गजल गायक.  

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका