यशवंत चिंतनिका

यशवंत चिंतनिका ४३

स्वातंत्र्याचे यज्ञकुंड

स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे होमकुंड, यज्ञकुंड देशात धगधगल्यानंतर त्यातलाच एक निखारा म्हणून मी राहिलो, तो संधी म्हणून नव्हे. यज्ञकुंड धगधगत राहावे यासाठी राहिलो. ‘संधिसाधू’ हा शब्दही त्या काळात माझ्या पिढीच्या आसपास वावरत नव्हता. निखारा राहण्याचे आमच्या पिढीने स्वीकारले ते संधी म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून. संधिसाधुपणाने यज्ञकुंडातून बाहेर पडतो, तो एकटा निखारा धगधगता राहू शकत नाही. त्याची राख होते. राख होऊ द्यावयाची ती संकुचित भावनांची, क्षुद्रतेची. आमच्या पिढीने ती पूर्वीच केली. संघटनेच्या, समूहाच्या महान यज्ञात सातत्याने जळत राहून आपले आणि राष्ट्राचे जीवन तेजस्वी बनविण्याचे, उन्नत करावयाचे, हाच ध्यास राहिला.