कथारुप यशवंतराव

कथारुप यशवंतराव-आपला मान आपणच राखला पाहिजे !

आपला मान आपणच राखला पाहिजे !

राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असूनही यशवंतरावांचे जीवन एकांगी बनले नाही याचे कारण त्यांना इतिहास, साहित्य, शास्त्र, नृत्य, संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये रुची होती व जिज्ञासू वृत्तीने नवे ज्ञान घेण्याची त्यांची सदैव तयारी होती.  प्रत्येक क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांविषयी त्यांना डोळस आदर होता. या आदराची साक्ष देणारा हा प्रसंग.

औरंगाबाद शहरात संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले होते. यशवंतरावांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार होते. त्याप्रमाणे यशवंतराव आले. महोत्सवाचे उदघाटन त्यांनी केले.
पण संपूर्ण उदघाटनसमारंभात त्यांना काहीतरी खटकले होते. मंचकावर चाललेली राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लुडबूड त्यांना आवडली नाही. स्टेजवर राजकारणी पुढे व कलाकार मागे असे चित्र दिसत होते. कलाकारही बिचारे कोप-यात अंग चोरून, जागा मिळेल तिथे बसले होते. काहीजण उभे होते. आपल्या उदघाटनपर भाषणात यशवंतरावांनी अशा कार्यकर्त्यांना फटकारले. ते म्हणाले, ' अशा कलेच्या क्षेत्रात राज्यकर्त्यांची जागा येथे व्यासपीठावर अगर रंगमंचावर नसून श्रोत्यांत कुठेतरी मागच्या बाजूला आहे. रसिक श्रोता अगर प्रेक्षक म्हणून त्याने पुढचे स्थान जरूर मिळवावे. परंतु हे स्थान प्रेक्षकांतले व श्रोत्यांतलेच असेल हे लक्षात ठेवावे, आणि कलेच्या क्षेत्रात काम कराणारांनीही आपला मान स्वत:च राखला पाहिजे. सत्तेचा तिरस्कार नको, हे खरे पण सत्तेपुढे सदैव लांगुलचालन तर अजिबातच नको.'
यशवंतरावांचे हे भाषण रसिकांना व कलाकारांनाही खूप काही शिकवून गेले.