कथारुप यशवंतराव

कथारुप यशवंतराव-हे योग्य नाही !

हे योग्य नाही !

सन १९६२ साली यशवंतराव दिल्लीला गेल्यापासून मारोतराव कन्नमवारांची अल्पशी कारकीर्द वगळता जवळपास बारा वर्षे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सचोटीने आणि दूरदृष्टीने महाराष्ट्राचा कारभार केला. पण १९७४ साली मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी सुरू झाली. वसंतराव विदर्भातून आले होते. विदर्भाला पुरेशी संधी मिळाली असून आता मुख्यमंत्री मराठवाड्याचा झाला पाहिजे, अशी मागणी विधीमंडळातील काँग्रेसचे सदस्यसुद्धा करु लागले. याबाबतीत यशवंतरावांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांचे म्हणणे होते की, मराठवाड्याच्या आग्रहाचा स्वीकार आपण निश्चितपणे केला पाहिजे, पण वसंतराव नाईक यांची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी मराठवाड्याच्या नेतृत्वाचा विचार करावा. वसंतरावांनी दहा- अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समर्थपणे काम केलेले असताना त्यांना एकदम दूर करणे योग्य होणार नाही. पक्षाच्या बैठकीमध्ये यशवंतरावांनी ही भूमिका मांडली, परंतु बहुसंख्य आमदारांचे मत वेगळे होते. मग मात्र यशवंतरावांनी त्यांचे व्यक्तिगत मत बाजूला ठेवले आणि बहुमताचा आदर करुन मराठवाड्याचे शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोलाचे सहकार्य केले.

यशवंतराव हे असे नेते होते की त्यांच्या सहका-यांनीसुद्धा त्यांची एखादी भूमिका पटली नसेल तर तसे त्यांनी स्पष्टपणे सांगावे हा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.